डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - डॉ. संजय मुन यांनी लिहिलेले ग्रंथ मौलिक असून पुढील काळात त्यांनी आपले कार्य अधिक जोमाने करावे, त्यांनी साहित्यातून केलेली मांडणी ही समताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या निर्मितीची असून डॉ. मुन हे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील फुले-आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक आहेत, असे गौरोद्गगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे यांनी काढले.
त्या रमाई मासिक, रमाई फाऊंडेशन, सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. संजय मुन यांच्या गौरव सोहळ्यात स्थानिक मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमातून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. वासुदेव मुलाटे होते.
डॉ. दासू वैद्य बोलतांना म्हणाले की, “सूर्य शोधणारा हा ‘मुन’ आहे. संजय मुन यांची वृत्ती निवृत्तीची नसून उर्वरित आयुष्य त्यांनी संशोधनासाठी खर्च करावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दासू वैद्य यांनी केले.
डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, “संजय मुन यांनी साहित्य आणि आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची मांडणी ही नेहमी चिंतकाची असते. सध्या समाजात मूलगामी चिंतकांची कमतरता आहे. अशा काळात संजय मुन हे मूलगामी चिंतन करणारे महत्त्वाचे विचारवंत आहेत.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांची माती शत्रूंनी नाही, तर त्यांच्या अनुयायांनीच केली, हे मी अत्यंत धाडसाने सांगतो,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आंबेडकरी चळवळीला ऊब देण्याचे काम संजय मुन यांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. वासुदेव मुलाटे बोलतांना म्हणाले की, सत्कार हा चिंतनाचा कार्यक्रम असतो. आज स्वतःविषयी बोलण्याच्या काळात दुसऱ्याविषयी बोलणे आणि चांगले बोलणे ही चांगली बाब आहे. आज जे काही चालले आहे ते तपासून घेतले पाहिजे. चळवळ ही प्रक्रिया आहे. तीला परिवर्तित केले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही खंबीरपणे उभी आहे. आज अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. चिंतनकार हा जीवनाचा शोध घेणारा असतो. डॉ संजय मुन समन्वयवादी विचारवंत आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय मुन म्हणाले की, हा सत्कार मी माझ्या गुरूंना, समर्पित करतो. माझ्या विद्यार्थ्यांना, मी जेथे जेथे काम केले त्या संस्थाना समर्पित करतो. कुटुंबाप्रती आभार व्यक्त करतो. सर्व नातेवाईक प्रति आभार व्यक्त करतो. सद्यस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत सुशिक्षीत पिढीवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. साहित्यिकांची जबाबदारी मोठी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी आपल्यावर दिली आहे. संकटाना सामोरे जात त्यामधून वाट काढत पुढे गेले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रेखा मेश्राम यांनी केले, मानपत्राचे वाचन प्रा. भारत शिरसाट यांनी केले, आभार ललिता खडसे यांनी मानले.
कार्यक्रमाला मंगल खिंवसरा, डॉ उत्तम अंभोरे, भाऊराव अंभोरे, डॉ. यशवंत खडसे, डॉ. भगवान धांडे, डॉ. धनराज गोंडाने, मंगल मुन, अँड. के. ई. हरिदास, डॉ. महेश खरात, अनंत भवरे, दैवशाला गवदे, रतनकुमार साळवे, बुद्धिनाथ बराळ आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या