' मोर्चाच्या आडवे याल तर...'; शिवसेना प्रचंड आक्रमक, शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

' मोर्चाच्या आडवे याल तर...'; शिवसेना प्रचंड आक्रमक, शिंदे-फडणवीसांना थेट इशारा



मुंबई : भाजप नेत्यांकडून विविध महापुरुषांचा अवमान होत असल्याचं सांगत आज महाविकास आघाडीकडून मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी देताना विविध अटी-शर्ती घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून सरकारला आक्रमक इशारा देण्यात आला आहे. 'महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे व ते दिल्लीचे गुलाम आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत, पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही. ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल. महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा,' असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे-फडणवीसांना आव्हान दिलं आहे.
सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी आजच्या मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली आहे. 'छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महान दैवतांचा अपमान होत असताना मऱ्हाठी जनता गप्प बसेल काय? छे, छे! ही जनता शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयजयकाराच्या बुलंद घोषणा देत महामोर्चात सामील होईल. शिवरायांचा महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आजचा महामोर्चा आहे,' असं 'सामना'त म्हटलं आहे.
'महाराष्ट्राशी उभा दावा मांडला'
'महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा का निघत आहे, हे राज्यातील बेकायदा-बेइमान सरकारने समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राला दिल्लीश्वरांच्या पायाशी गहाण टाकण्याच्या कारवाया उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे बनवणाऱ्या महाशक्तीविरोधातील लढाईचे हे रणशिंग आहे. साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज परक्या शत्रूंबरोबर लढले. तो शत्रू म्हणजे मोगली महाशक्तीच होती. पण आजचे स्वतःला महाशक्ती म्हणवून घेणारे दिल्लीचे सत्ताधारी आणि त्यांचे महाराष्ट्रातील मांडलीक स्वकीय असूनही त्यांनी महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे,' असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे.दरम्यान, आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या या मोर्चाला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि या मोर्चाला सत्ताधाऱ्यांकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या