हरिभाऊ तुमचे चुकलेचं!

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हरिभाऊ तुमचे चुकलेचं!

(आंबेडकरी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांच्या निधनानंतर लिहिलेल्या वादग्रस्त लेखाला औरंगाबाद येथील पत्रकार आनंद चक्राणारायण यांनी दिलेले उत्तर)

हरिभाऊ तुमचे चुकलेचं!

हरिभाऊ ! सप्रेम जय भीम ! आपला प्रा अविनाश डोळस सरांच्या दुखःद निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला लेख मक्स महाराष्ट्र या न्यूज़ पोर्टल वर वाचला ! आपल्या लेखांत आपण असे म्हणालात की सच्चा मित्र ! मग सच्च्या मित्राची त्याच्या म्रुत्यूनंतर त्याच्यावर टीका करणे योग्य आहे का ! आपण असे लिहिलेत की अविनाश प्रकाश आंबेडकरांचा विश्वासू सहकारी होता ! मा . बाळासाहेबांचा तो निस्सीम भक्त होता ! तेव्हडा  विषय आला की त्याचे विचार करण्याचे  इंद्रिय तो बंद करायचा आणि निष्ठावंत  अनुयायी या  भूमिकेत जायचा !तो बाळासाहेबांच्या प्रत्येक क्रुतीचे समर्थन करायचा ! एरव्ही चिकित्सक असणारा अविनाश बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र  फक्त भक्त असायचा !                                हरीभाऊ ! आपल्याला भक्त आणि अनुयायी यातला फरक कदाचित समजत नसावा !भक्त देवावचे असतात तर अनुयायी परिवर्तनवादी विचार पेरणार्या विचारसरणीचे असतात ! बाळासाहेब आंबेडकर हे एक परिवर्तनवादी विचार पेरणारा वाहक आहे !  बाळासाहेब आंबेडकर सामाजिक चळवळीत येण्यापूर्वी अविनाश डोळस हे दलित युवक आघाडीच्या माध्यमातून कार्यरत होते ! मिलिंद कॉलेजात विद्यार्थी  असतांना विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ आंदोलन , नामांतर आंदोलन ', एक गाव एक पाणवठा आंदोलन , बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील खळवट निमगाव बहिष्कार आंदोलन , आदींसह अनेक आंदोलनात अविनाश डोळस नामक विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून सक्रिय होते ! तेव्हा तुम्ही कुठे होतात हरिभाऊ ! तुमचा तर तुम्ही पुण्यात एका खाजगी कम्पनीत कार्यरत होता!  आणि बाळासाहेबांनी 1980 साली  जेव्हा चळवळीत सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून उडी टाकली आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या  राजकीय पक्षाच्या बेनरखाली ते  1984 साली अकोला लोकसभेची निवडणूक लढले ! त्यांना एक लाख पासष्ट हजार मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले ! हे सर्वच प्रस्थापित पक्षांना हादरा देण्यासारखे होते ! जे आर पी आयचे गट वा नेते सीट और नो सीट अवर वोट फॉर कॉंग्रेस या सेटिंग मध्ये व्यस्त होते त्यांची राजकीय कारकीर्द या नव्या अभिसारणाने समाप्त झाली ! आणि महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू भय्यासाहेबांचा पुत्र अँड प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हे  एक नवं नेत्रुत्व उदयास आलं ! आणि विशेष म्हणजे आंबेडकरी समाजाबरोबरच इतर वंचित घटकांनी सुद्धा स्वीकारलं ! यात अविनाश डोळस ही अपवाद नव्हते ! मुळातच  भारतीय रिपब्लिकन पक्षासोबत बहुजन महासंघाची निर्मिती करवी याबाबत डोळस सरांची बाळासाहेबांसोबत अनेकदा चर्चा ही झाली होती .कारण ते आंबेडकरी चळवळचे दूरदृष्टीचे भविष्य पाहणारे मुत्सद्दी राजकारणी होते ! त्यांची दलित युवक आघाडी त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षात विलीन केली ! आणि तेव्हापासून म्हणजे 1986पासुन ते भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि पुढे याच पक्षाचा विस्तार होऊन भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाशी ते आपल्या म्रुत्यूपर्यंत एकनिष्ठ राहिले ! पक्षाला चांगले दिवस असतांना ते 1996 ला औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत खासदारकी साठी उभे राहिले आणि लाखाच्या आसपास त्यांनी मते ही मिळवली ! त्यांचा पक्ष जेव्हा सत्तेत सहभागी झाला तेव्हा ते पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष होते ! त्यांना वाटले असते तर ते मंत्री झाले असते ! विधान परिषदेवर गेले असते वा एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष झाले असते ! पण त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ! मागितले तर फक्त कार्यकर्त्यांसाठी ! पक्षाच्या प्रचारासाठी आणि निवडणुकीत तिकिट वाटपासाठी ते महाराष्ट्रभर फिरले ! या तिकिट वाटपात ते हवे तेवढे रूपये कमवू शकले असते ! पण त्यांनी पक्ष कार्य तडीस नेणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकिट तर दिलेच पण निवडणुक लढविण्याची आर्थिक कुवत नसलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून निवडणूक निधीसुद्धा उपलब्ध करून दिला ! आणि फाटक्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसविले !भारीप आणि बहुजन महासंघाच्या जडणघडणीत त्यांचा फार मोलाचा वाटा होता ! बौद्धेत्तर माणसे जोडण्यात त्याचा फार मोठा हातखंडा होता ! सोबतच त्यांचं बोलणं वागणं आणि अनुकरण हे जातीविरहित समाजरचनेच होतं ! ते डीकास्ट सोसाइटी चे पुरस्कर्ते होते ! हे झाल फक्त पक्षाच्या कार्याच! आपला मित्र आणि आमचा गॉडफादर तर बाबासाहेबांच्या वारसाचा आपल्या म्हणण्याप्रमाणे भक्त होता आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे धम्मसेनापती होता ! आपण कुणाचे भक्त आहात ? कदाचित आपल्यालाच विसर पडला असेल पुणे येथे एका सभेत आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळीतचे वारसदार शरद पवार अशी मुक्ताफळे उधळली होती !हे आंबेडकरी चळवळीच्या प्रबोधनासाठी झटनाऱ्या दैनिक व्रुत्तरत्न सम्राट मध्ये प्रसिद्ध झाले होते ! सम्राटाकारानी आपल्या या दुष्क्रूत्यावर झणझणीत अग्रलेख लिहून आपली सत्यता आणि आपला चाटूगिरी चा पराक्रम समस्त जनतेसमोर मांडला होता !  हे आंबेडकरी जनता अजून विसरलेली नाही ! आणि आपल्या ह्या शब्दफेकी नंतर महाराष्ट्रात जो आंबेडकरी अनुयायांत संताप उसळला होता हे ही आम्ही वीसरलेलो नाही ? आपण तर आपल्या बापाला विसरून लोकांच्या बापाला आपला बाप बनवायला निघालात ! म्हणजे पाटलाचं घोडं अन .........राला भूषण ! अशी तुमची स्थिती आहे ! तुम्हांला डोळस सरांना आंबेडकर भक्त म्हणण्याचा कुठलाही  नैतिक अधिकार नाही ! आणि अजून पुढे आपण असे म्हणता की प्रा  दत्ता भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर अविनाशला नेमावे यासाठी  मी सचिवांकडे शिफारस केली ! आग्रह धरून पाठपुरावा केला ! आमचे अधिकारी मित्र शुद्धोधन आहेर यांनी शासनादेश काढण्यासाठी खूप मदत केली ! हरिभाऊ याचा खुलासा करु इच्छितो ! आपण जेव्हा समितीवर सदस्य सचिव होतात त्यावेळी आपल्या अकार्यक्षम शैलीमुळे आपल्यावर सम्पूर्ण महाराष्ट्राभरातून टीका टिप्पणी होत होती ! आणि आपले फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे वारसदार शरद पवार यांचे आघाडीचे मंत्रिमंडळ सत्तेत हौते ! त्यांना तुम्ही डोईजड झाले होते! म्हणून आपल्यालाच त्या पदावरून दूर हटविण्यात आले नव्हे आपली कायदेशीरपणे उचलबांगडी करण्यात आली ! आणि आपल्या जागीच प्रा दत्ता भगत सर यांना नेमण्यात आले ! परंतु दत्ता भगत सर यांच्या प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ह्या पदाचा राजीनामा दिला ! मग ह्या पदाला कोण व्यक्ती न्याय देउ शकतो आणि कोण हे जोखीमेचे पद संभाळून घेऊ शकतो म्हणून महाराष्ट्रभर सरकारची फेरी झाली ! आणि त्यांनी प्रा अविनाश डोळस सरांसारखा मुरब्बी अभ्यासक शोधून काढला ! आपल्या शिफारशीनुसार सर सदस्य सचिव झालेले नाहीत हा आपला गोड गैरसमज आहे ! आणि शासकीय अधिकारी हा सरकारचा बाबू असतो ! मंत्री जे सांगेल तो ते करतो ! आणी डोळस सर मंत्र्यांपेक्षा मोठे महामंत्री होते ! त्यामुळे आपण शिफारस करणे आणी सरकारी बाबू ने शासकीय अध्यादेश काढणे संयुक्तिक न वाटता हास्यास्पद वाटतेय ! आणी येथेच आपली बौद्धिक कुवत समाजासमोर अगदी लाजिरवाणी होते !                हरिभाऊ परत आपण म्हणता की डॉ बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र खंड 22मधील नवीन सुधारित आव्रुत्तीत संशोधनाची सर्व शिस्त धाब्यावर बसवून पहिल्या आव्रुत्तीच्या आम्हा सर्वांचीच नावे हेतुपुरस्सरपणे गाळून टाकली ! आपल्याला त्याचे वाईट वाटले ! चळवळीत टोकाचा अविश्वास , असूया आणि जातीयवाद आहे ! अविनाश कधीही तसा नव्हता ! पण  त्याच्यावर त्याच्या सहकाऱ्यांचा , नेत्याचा  दबाव असेल ! इथे आपली खरी व्रुत्ती लक्षात येते ! आपला विचार निकोप नाही ! आपल्या मनात जातीयवाद रुजला आहे ! जातिविरहित समाज रचनेच्या पुरस्कर्त्याला आपण जातीत अडकवू पाहत आहात ! म्हणजे एक सिद्धच झाले की आपण बारामतीकरांचे पक्के समर्थक आहात ! कारण बारामतीकर आणि आंबेडकर यांचे जमत नाही हे साऱ्या जगाला माहीत आहे ! कारण आंबेडकर आंबेडकर आहेत !  (मी भक्त आणि अनुयायी म्हणत नाही )जो  माणूस मिलिंद कॉलेजात शिकला तेथेच प्राध्यापक म्हणून त्याने आयुष्य अर्पण केले ज्याने  अनेक चळवळी बघितल्या तो कुणाच्या दबावाला बळी पडेल असे तुम्हाला वाटत असेल पण आम्हाला वाटत नाही ! आणि हे तुम्ही प्रा अविनाश डोळस सर जिवंत असतांना लिहिले असते तर बरे झाले असते ! पण ते  गेल्यानंतर तुम्ही लिहून मोठी फुशारकी मारण्याचा प्रयत्न करीत असाल तर याद राखा ! रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष खा एन शिवराज काय म्हणाले होते हे जरा लक्षात घ्या ! डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दयान लाईव्ह आंबेडकर!  प्रा अविनाश डोळस या आंबेडकरी चळवळीचे प्रॉडक्ट आहे ! समाजाची इंटेलेक्चुयल हॉनेस्टी आहे ! आणि हा प्रॉडक्ट आम्ही 1950  पासुनच अनुभवला आहे ! तो कशा रीतीने तयार झाला हे ही आम्हाला माहीत आहे ! तो किती कसदार आहे हे आम्हाला कुण्या हरीभाऊने सांगण्याची गरज नाही ! ज्यांचे नरक मय  आडनाव बदल होणे संभव नाही त्याने आम्हाला डोळस कसे होते हे शिकवू नये! डोळस सर शरीर रूपाने हयात नाहीत पण त्यांनी आम्हाला जी सम्यक द्रुष्टी दिली आहे ! त्या द्रुष्टीतून आम्ही समस्त चळवळीकडे पाहतो आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे आकलन सुद्धा करतो ! म्हणून एक डोळस जरी गेला असेल तरी त्याने हजारो डोळसांची निर्मीती केली आहे हे आपण विसरू नका ! जरा तथागत बुद्धाची करुणा अंगीकारा आणि त्याच निकोप द्रुष्टीने समस्त समाजाकडे बघा ! समाज तुम्हांला स्वीकारेल आणि डोक्यावर घेईल ! अन्यथा अशी दुटप्पीपणाची भावना अंगिकारली तर तुमची समाजाला बायपास सर्जरी करावी लागेल ! हरिभाऊ ! तुम्ही चुकलात !आणि तुम्ही जी चूक केली तिला आंबेडकरी जनतेकडून माफी नाही !         

पत्रकार आनंद दिवाकर चक्रनारायण 
औरंगाबाद 
मो. 7058630366

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

शोभीत सुरवाडे म्हणाले…
आद डोळस सर , यांच्या विषयी आज आपल्या लेखातून चळवळीच्या नाळेशी जुडलेल्या एका खऱ्या व्यक्तीमत्वाची ओळख झाली , तसा सरांचा परिचय तर होताच पण खरी ओळख आज सर हयात नसतांना होत आहे याची मनाला चुणूक लावून जात आहे ,
आयु आनंद सर आपण दिलेल्या उत्तराला सादर सलाम , जय भीम