दुःखाचे कारण आणि उपाय सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले! - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दुःखाचे कारण आणि उपाय सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले! - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले! - भन्ते अश्वजीत


सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर तथागतांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी शोधून काढलेला जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय! तो मार्ग सर्वप्रथम त्यांनी पंचवर्गीय भिक्खुंना सारनाथ येथे सांगितला. चार आर्यसत्यांपैकी पहिले आर्यसत्य म्हणजे दुःख होय. दुःख हा विश्वातील सामान्य माणसाचा अनुभव काय आहे ते स्पष्ट होण्यासाठी या शब्दाचा उपयोग केला जातो. दुःखाचे समानअर्थी शब्द म्हणजे अस्वस्थता, चिंता, वेदना, शोक, खेद, असुरक्षितता, अप्रियता, यातना, गैरसमज, भांडण, असमाधान. परंतु या सर्व शब्दांपैकी सर्वमान्य पावलेला शब्द म्हणजे दुःख हाच आज प्रचलित आहे. तथागत आपल्या प्रथम प्रवचनात स्पष्ट करतांना म्हणतात, "भिक्खूनो जन्म हे दुःख आहे, म्हातारपण हे दु:ख आहे, आजारी पडणे दुःख आहे, अप्रियांचा सहवास हे दुःख आहे, प्रियांचा वियोग हे दु:ख आहे, मृत्यू येणे हे दुःख आहे. म्हणजे आपणास जे हवे असते ते न मिळणे म्हणजे दुःख आहे." अर्थात मनाच्या विरूध्द घडणे म्हणजे दुःख आहे. त्याचप्रमाणे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच बाबींना पाच उपादान स्कन्ध म्हणतात. 

१) रूप स्कंध : पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चार भौतिक घटकांपासून रूप स्कंध तयार होते.

२) वेदना स्कंध : सुखकारक वेदना, दु:खकारक वेदना आणि असुखद-अदुः:खद वेदना यांना वेदना स्कंध म्हणतात.

३) संज्ञा स्कंध : घर, झाड, गाव, स्त्री, पुरूष इत्यादींची ओळख यास संज्ञा स्कंध म्हणतात. अर्थात पदार्थांना निरनिराळी नावे देण्याची मनाची शक्ती तिला संज्ञा स्कंध म्हणतात.

४) संस्कार स्कंध : संस्कार म्हणजे मनावर पडलेला प्रभाव. याचे कुशल कर्म, अकुशल कर्म आणि अव्याकृत कर्म असे तीन प्रकार आहेत.

५) विज्ञान : विज्ञान सहा आहेत. चक्षुविज्ञान, श्रोत विज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान व मनोविज्ञान या विज्ञानांच्या समुदायाला विज्ञान स्कंध म्हणतात. बुध्द म्हणतात 

हे पाचही उपादान स्कंध दु:खच आहे.पंचस्कंधाच्या या आसक्तीमुळे मनुष्यात अहंकाराची भावना निर्माण होते. माणसातील अहंकाराचा अतिरेक हे जगातील दुःखाचे मुळ कारण आहे. तथागत भगवान बुध्द हे वास्तववादी होते. त्यांनी दु:खाचे प्रकार आणि कारणे शोधली. तर दुःखाचे तीन प्रकार आहेत. अध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक दुःख.  

अध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक, व्यक्तीने स्वत:च्या वागणूकीने ओढवून घेतलेले दुःख म्हणजे आपल्याच कर्मामुळे उत्पन्न झालेले दुःख. जसे माणसाने लोभापाई किंवा मोहापायी हत्या केली तर त्याला त्यावेळी भलेही काही वाटणार नाही. पण नंतर मात्र त्याला दुःख होते, पश्चाताप होतो. जर माणसाने चोरी केली तर तक्षणिच त्याला बरे वाटेल.पण नंतर मात्र त्याला दुःख होते. आसक्तीमुळे माणसाचे हातून जर व्यभिचार घडला तर काही वेळाने किंवा काही दिवसांनी त्याला दुःख होतेच. तसेच माणूस जर जाणीवपूर्वक जाणूनबुजून खोटं बोलला तर ती वेळ तर तरून जाते परंतु नंतर मात्र त्याला दु:ख होते, वाईट वाटते. किंवा एखाद्या माणसाने दारू पिऊन स्वता:च्या संसाराची धुळधाण आणि शरीराची राखरांगोळी स्वत:च्या हाताने करणे यालाच अध्यात्मिक दुःख म्हणतात.

दुसरे आहे अधिभौतिक दुःख. म्हणजे सामुदायिक दुःख. विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढवणारी संकटे आणि त्यातून निर्माण होणारे दु:ख. मग ते प्रकरण बहुजनांवरील बहिष्काराचे असो की,सामूहिक हत्याकांडाचे असो,हाणामारीचे असो की अन्य कोणतेही असो त्यामुळे दु:खाचीचनिर्मिती होते.

तिसरे म्हणजे अधिदैविक दुःख. याचा अर्थ आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे दुःख उदाहरणार्थ, रेल्वे ,जहाज, विमान, आगबोट, मोटार अपघात. वादळाने होणारी हानी, महापुराने ओढवणारी आपत्ती, आगीमुळे होणारी हानी.तसेच आता जी कोरोना नावाची रोगराई आली या सर्व दुःखांना अधिदैविक दुःख म्हणतात. तथागतांनी जगातील जशी तीन प्रकारची दुःखे शोधून काढली. तशीच ती नष्ट करण्याचा प्रभावी मार्ग सुध्दा शोधून काढला. वयक्तिक आचरणामुळे ओढवणारी दु:खे नाहीसे करण्यासाठी पंचशील हे साधन आहे.  

पंचाशीलाचे काया वाचा मनाने जर आम्ही पालन केले तर निश्चितच ती दुःखे नष्ट होऊ शकतात. ते येणेप्रमाणे;

१) मी कोणत्याही प्राणी मात्रांची हत्या करणार नाही उलट सर्व प्राणीमात्रावर प्रेम करीन, त्यांचेशी मैत्री करीन, त्यांचेशी सौजन्याने वागेन. म्हणजेच माझा कोणीही शत्रू म्हणून उरणार नाही.

२) मी चोरी करणार नाही त्याऐवजी दान करीन.

३) मी व्यभिचार करणार नाही उलट सदाचाराने वागेल. या शरीराला कुठला कलंक अथवा दाग लागू देणार नाही.

४) मी कुणाची चुगली करणार नाही, निंदा करणार, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि खोटे बोलणार नाही.त्याऐवजी सत्य तेच बोलेन.

५) मी कच्ची पक्की दारू पिणार नाही. नशिल्या पदार्थांचे सेवन करणार नाही, अशा प्रकारे आम्ही जर वागण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मिक दु:ख आपल्यापर्यंत येऊच शकणार नाही. 

अधिभौतिक दुःखे नष्ट करण्यासाठी तथागतांनी आम्हाला अष्टांगिक मार्ग हे प्रभावी साधन दिले आहे.

१) सम्यक दृष्टी : सम्यकदृष्टी म्हणजे अविद्येचा विनाश करणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले म्हणजे त्याला सम्यक अवलोकन असे सुध्दा म्हणतात. दुःख म्हणजे काय? त्याचे कारण काय? त्याचा निरोध कसा करता येतो आणि निरोधाचे साधन कोणते याचे ज्ञान असणे म्हणजे सम्यक दृष्टी.

२) सम्यक संकल्प : यामध्ये तीन बाबी सामाविष्ट आहेत. १) ज्ञानेंद्रिय सुख कमी करणे, त्यांचा त्याग करणे. २) मैत्री करूणेचा विकास करणे.३) अहिंसा, चांगले विचार आणि स्नेहभाव यांचा सराव करून वृध्दी करणे, म्हणजेच आमचा संकल्प हा लालसा आणि तृष्णेपासून मुक्त होण्याचा असावा.

३) सम्यक वाचा : नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलणे टाळावे. चुगली चहाडीमुळे कलह होतात समाजात गट-तट पडतात. समाज एकसंघ राहत नाही. म्हणजे अशा प्रकारची वाचा ही समाजासाठी घातक आहे. म्हणून समाजसौख्य वृध्दीसाठी प्रत्येक अभद्र शब्दप्रयोग टाळावा म्हणजे दुःख उत्पन्न होणार नाही.

४) सम्यक कर्मात : हत्या, चोरी आणि व्यभिचार हे तीन प्रकारचे गैरकृत्ये माणसाचे हातून घडतात. कारण प्राणीहत्या केल्याने व्यक्तीमधील क्रुरतेची वृध्दी होते. चोरी केल्याने व्यक्तीची गुन्हेगारी वृत्ती वाढते. तर लैंगिक मिथ्याचार केल्याने कामवासनेला चालना मिळते. व्यक्ती कामांन्ध होतो. म्हणून माणसाने दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखुन प्रत्येक कृती करावी.

५) सम्यक आजिविका : म्हणजे सन्मानाने प्राप्त केलेल्या जिविकेवर उदरनिर्वाह चालविणे, म्हणजे शस्त्र व्यापार, मांस व्यापार, मानवांचा व्यापार, मद्यांचा व्यापार आणि विषाचा व्यापार करू नये तर सम्यक आजिविका करून आपला प्रपंच चालवावा.

६) सम्यक व्यायाम : जे हानीकारक विचार अद्याप मनात निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रतिबंध करावा. जे हानीकारक विचार निर्माण झाले आहेत त्यांच्या वाढीवर प्रतिबंध घालावा. जे विधायक विचार अद्याप निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रयत्नशील असावे. आणि जे चांगले विचार निर्माण झालेले आहेत त्यांचे संवर्धन व्हावे.

७) सम्यक स्मृती : सम्यक स्मृती चार प्रकारच्या आहेत. १) कायानुपसना २) वेदनानुपसना ३) चित्तानुपसना ४) धम्मानुपसना. सती म्हणजे स्मृती. म्हणजे साधक येथे चिंतन करतांना शरीर, वेदना, मन आणि मन-घटक यावर आपली एकाग्रता केंद्रीत करतो. उत्साह पुर्वक जागृत असतो. सावध असतो. भौतिक लालसा व निराशा त्याने बाजूला सारलेल्या असतात. पूर्णपणे वरील चार बाबींवर त्याचे चित्त केंद्रीत असते. अशा प्रकारच्या ध्यानाच्या सरावातून व्यक्ती परिशुध्द होत असतो. दुःखावर मात करतो,वेदनामुक्त होतो, शोकविरहित होतो, सन्मार्गावरून चालतो, त्याला निब्बाणाची जाणीव होते.

८) सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे मनाची तल्लीनता होय, यामध्ये जे पाच अडथळे येतात ते दुर केले की आपला मार्ग सुखकर होतो. १) ज्ञानेंद्रिय उपभोग आनंद २) दुष्ट इच्छा ३) आळस व सुस्ती ४) चिंता व अस्वस्थता ५) संशय वृत्ती हे पाच अडथळे ध्यानाची एकाग्रता वाढू देत नाहीत तेव्हा साधकास यापासून सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे, असे आचरण केले की, अधिभौतिक दुःखे नष्ट होतात. यातील तिसरे म्हणजे अधिदैविक दुःख नष्ट करण्यासाठी भगवंतांनी शीलमार्ग अनुसरणे हा उपाय सांगितला आहे. 

शीलमार्ग अर्थात १० पारमिता.

१) शील : शील म्हणजे नितिमत्ता. वाईट गोष्टी न करण्याकडे मनाचा असलेला कल. म्हणजेच अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भितीने वाईट गोष्टी टाळणे म्हणजेच शील.

२) दान : स्वार्थीची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी स्वत:ची मालमत्ता, रक्त, जीवनावश्यक वस्तु, देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय.

३) उपेक्षा : फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. अनासक्ती आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिती.

४) नैष्क्रर्म्य : ऐहिक सुखाचा त्याग म्हणजे नैष्क्रर्म्य..

५) वीर्य : वीर्य म्हणजे उत्साह, जोम.हाती घेतलेले काम सर्व सामार्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. तसेच जनकल्याणाची कामे जोमाने आणि तत्परतेने करणे.

६) शांती : क्षमाशीलता म्हणजे शांती. द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे हाच शांतीचा उद्देश आहे.

७) सत्य : व्यर्थ बडबड न करणे, कुणाची निंदा-चुगली न करणे, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी न करणे आणि खोटे न बोलणे म्हणजे सत्य पारमिता होय.

८) अधिष्ठान : ध्येय गाठण्याचा दृढनिश्चय.

९) करूणा : सर्व प्राण्यावर मैत्री करणे, सर्व प्राणीमात्रावर दया करणे,त्यांचेवर प्रेम करणे. म्हणजे एकंदरित सर्व प्राणिमात्राविषयीची अनुकंपा करणे म्हणजे करूणा होय.

१०) मैत्री :सर्वप्राणीमात्रा विषयीच नव्हे तर मित्रांशी आणि शत्रूशी देखील मैत्री करणे. म्हणजेच सर्व जीवांविषयी बंधुभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय. अशा प्रकारे पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि १० शीलमार्ग याद्वारे

दुःखाचा निरोध करून माणसाला दुःखाचा विनाश करता येतो. मग ते दु:ख अध्यात्मिक असो की, अधिभौतिक असो अथवा अधिदैविक असो. अशाप्रकारे दुःख व त्याचे कारण आणि त्यावरील उपाय सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहेत. ज्याचा अवलंब केल्याने जगातील अनेक लोक सुखी झाले आहेत याचा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे.

भन्ते अश्वजीत

सदधम्म बुद्धविहार,आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.

भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा ! - भन्ते अश्वजित

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! - भन्ते अश्वजित, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

हे ही वाचा... मातापितु उपट्ठानं - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खुप छान लेख भंतेजी.
Unknown म्हणाले…
वंदामि भंते दुःखाचे कारणे आणि उपाय खुप अभ्यासपूर्ण लेख आहे.
दुःखावर उपाय पंचशील अष्टांगिक मार्ग.पंचस्कंध.दहापारमिता खुपचं सुंदर
sujay म्हणाले…
पु. भंतेजी खुप छान लेख आहे
NARENDRAKUMAR JADHAV म्हणाले…
खुप सोप्या भाषेत उमजेल असा सुंदर छान लेख आहे.
साधु साधु साधु.
वंदामी भंतेजी.
������